लासलगाव: भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने बंगळूरच्या गुलाबी कांद्यास निर्यातीकरिता मंजुरी देत असल्याची माहिती विदेश व्यापार विभागाचे महासंचालक बिद्युत स्वेन परिपत्रकाद्वारे दिली आहे. कांद्याच्या निर्यातीमध्ये आणि साठवणुकीवर मर्यादा घातल्याने देशांमध्ये कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून आले होते.
कृष्णा पुरम कांदा हा चवीने तिखट असल्याने याचा मोठ्या प्रमाणात उपयोग सांबर साठी वापर केला जातो तसेच औषधी गुणधर्म असल्याने या कांद्याला विदेशात चांगली मागणी असते. यामुळे २० हजार मैट्रिक टन कांदा निर्यातीस केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. आंध्रप्रदेशातील कृष्णपुरंम कांद्याला थायलंड, हॉंगकॉंग, मलेशिया, श्रीलंका आणि सिंगापूर मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
नाशिक सह राज्यातील बाजार समिति मध्ये कांद्याची आवक कमी होत असल्याने सध्या कांदा भाव खात आहे.वाढते दर लक्षात घेता केंद्र सरकारने नुकतीच कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे.मात्र केंद्राने ९ रोजी नोटिफिकेशन काढून कृष्णापुरम आणि बेंगलोर रोझ या कांद्यास निर्यातीकरिता मंजुरी दिली आहे. विशिष्ट एका राज्यातील कांदा निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.
बंगलोरचा गुलाबी कांदा आणि आंध्रप्रदेशच्या कृष्णपूरम कांदा निर्यातीला मंजूरी दिली असून चेन्नई पोर्ट वरून या कांद्याची निर्यात केली जाणार आहे. यासाठी कांदा निर्यातदार यांना फलोत्पादन आयुक्त कर्नाटक यांच्याकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे ३१ मार्च २०२१ पर्यंत कांदा निर्यात करता येणार आहे.
महाराष्ट्राला कधी परवानगी देणार?
केंद्राकडून घेण्यात आलेल्या कांदा निर्यातबंदी च्या निर्णयानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र वाणिज्य मंत्रालयाने हा निर्णय घेऊन फक्त कर्नाटक राज्यकरिता म्हणजेच बंगळूर गुलाबी कांद्यापर्यंत निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील लाल कांदाही आता काढणीसाठी सुरू होईल, तर राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा कधी देणार असा सवाल नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांनी उपस्थित केला आहे.